TOD Marathi

देशातील रेल्वे मार्गावरील आव्हानात्मक मार्गांपैकी एक असलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील (Konkan Railway) विद्युतीकरणाचे काम आता पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. मागील सात वर्षांपासून कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू होते. या विद्युतीकरणामुळे आता कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास देखील प्रदूषणमुक्त होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry of India) 2016 ला कोकण रेल्वेच्या विद्युतीकरणाला मंजुरी दिली होती. रत्नागिरी ते थिविम यादरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या मार्गावरील विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान ऑनलाईन हजेरी लावणार आहेत. कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, उडपी आणि मडगांव रेल्वे स्थानकांवर लोकार्पण कार्यक्रम पार पडणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. (Ratnagiri Railway Station) कोकण रेल्वेवर विद्युतीकरण झाले नसल्यामुळे डिझेल इंजिनाच्या मदतीने या मार्गावर रेल्वे वाहतूक होत होती. साधारणपणे 12 डब्यांच्या रेल्वेगाडीला एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी 6 ते 10 लिटर डिझेलची आवश्यकता भासत होती. इंजिनाच्या क्षमतेनुसार यात बदल होतो. आता, विद्युतीकरण झाल्यामुलळे इंधनाची बचत होणार आहे. महत्वाचं म्हणजे प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणेही शक्य होणार आहे.